सकाळी सातच्या सुमारास म्हणजे जेव्हा गाड्यांविना रस्ते रिकामे असतात त्या काळात रस्त्यांवर रिकामटेकड्या कुत्र्यांचं साम्राज्य असतं. एखादी चार चाकी गाडी दिसली की त्याच्यामागे काही मीटर अंतरापर्यंत भुंकत जायचं आणि जणू काही मीच गाडी पळवून लावली आहे, या अविर्भावात परत मागे फिरायचं. असा रस्त्यावरील अनेक कुत्र्यांचा उद्योग असतो!
शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२
नेहमीच कुत्रं
सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२
तीन पायांची शर्यत - बाळ फोंडके
विज्ञानकथा या बऱ्याचदा कल्पकतेच्या आधारावर रचल्या गेल्या असल्या तरी त्या विज्ञानाला धरूनच असतात, हे या कथांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. बाळ फोंडके हे त्यांच्या विविध कथासंग्रहातून विज्ञाननिष्ठ लेखक म्हणून परिचयात आहेत.
या कथासंग्रहामध्ये देखील ते आपला विज्ञाननिष्ठ बाणा सोडत नाहीत. विशेष म्हणजे या पूर्ण कथासंग्रहातील कथा या गर्भाशय आणि मातृत्व या दोनच गोष्टींविषयी भाष्य करताना दिसतात. एक हाडाचा वैज्ञानिक उत्तम साहित्यिक असतो तेव्हा अशा कथा तयार होतात, असे बाळ फोंडके यांच्याबद्दल म्हणता येईल. प्रत्येक कथेचे बीज हे मातृत्व संकल्पनेभोवती तयार झालेला आहे. मातृत्व म्हणजे नव्या जीवाला जन्म देणं. जेव्हा एखादा नवा जीव या विश्वामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस तयार झालेले वैज्ञानिक गुंते व त्यातून निर्माण होणारे भावनिक गुंते या कथांमधून आपल्याला समोर येतात आणि त्यातून विज्ञानाची किमया देखील पक्की लक्षात येते. एकेकाळी जेव्हा विज्ञान प्रगत नव्हतं तेव्हा स्त्रियांना मातृत्वाविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. पण प्रगतीच्या नव्या द्वारांनी अनेक अडचणींवर मात केली. त्यातून आई होण्यासाठी स्त्रीला येणाऱ्या अडथळ्यांवर विज्ञानाने उपाय सुचवले. पण यातून सामाजिक आणि भावनिक समस्या देखील तयार होत गेल्या. हा एकच गाभा असला तरी प्रत्येक कथेचे बीज हे निरनिराळे आहे. किमान स्त्रियांना तरी ते विशेष भावेल, याची आशा वाटते.
शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२
अशाच एका सिग्नलवर
सकाळचे ११ वाजून गेले होते. रावेतहून आकुर्डीकडे आपल्या कारने तसा निवांतच चाललो होतो. रस्त्यावरची रहदारी नेहमीसारखी दिसून येत होती. या रहदारीमध्ये दिसणारी वाहन चालकांची गडबड आणि वेंधळेपणा हा नेहमीचाच. पण मी त्याचा भाग नव्हतो, याचे काहीसे समाधान मला वाटत होते.
एका मुख्य रस्त्यावर लाल सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवली. सिग्नल चालू असून देखील रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहन चालकांची ये-जा सुरूच होती. संध्याकाळी जशी असते तशी रहदारी नसली तरी बऱ्यापैकी वाहने रस्त्यावर फिरत होती. परंतु त्यातील कोणीही सिग्नल पाळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. मी मात्र झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असणाऱ्या रेषेला खेटून माझी गाडी उभी केली होती. इतर तीनही बाजूंनी गाड्या सिग्नलकडे न पाहता आपापल्या रस्त्याने पुढे चालत होत्या. आजवर काहीही झाले तरी मी सिग्नल तोडला नव्हता. एका आदर्श नागरिकाप्रमाणे सिग्नलवर मी एकटा जरी असलो तरी तो पाळत असेच. आणि त्याचा मला अभिमान देखील होता. सिग्नल न पाळणारे किती मूर्ख, याचा अंदाज मी इतर वाहनचालकांकडे बघून घेत होतो. दोन वाहने त्या चौकामध्ये एकाच वेळी समोरासमोर यायची. दोनही वाहन चालकांची नजरा नजर व्हायची. कदाचित मनातल्या मनात शिव्या देखील दिल्या जात होत्या. मग एक जण माघार घेऊन निघून जायचा. त्यानंतर दुसरा देखील त्याचा रस्ता सोडत नव्हता. एकंदरीत गाढवांचा गोंधळ त्या चौकामध्ये दिसून आला.
आपल्या देशातील लोक किती बेशिस्त आहेत याची प्रचिती त्या सिग्नलवर मला येत होती. याच गोष्टीमुळे आपली लोकं मागे राहतात. आपण फक्त बाहेरच्या देशातील लोकांना चांगले म्हणतो, त्यांची स्तुती करतो. परंतु त्यांचे चांगले गुण आत्मसात करत नाही. हा आपल्या देशातील लोकांचा दुर्गुण आहे, असे म्हणावे लागेल. माझ्या या विचारचक्रामध्ये सिग्नल वरील इकडून तिकडे बेशिस्तपणे फिरणाऱ्या वाहनचालकांच्या हॉर्नचा कर्कश्य आवाज देखील मिसळला जात होता. ते आवाज हा भयंकर रहदारीचा रस्ता आहे, याची आठवण करून देत होते. मी मात्र त्या मूर्ख वाहन चालकांच्या हालचालींकडे शहाणपणाने पाहत होतो. वाहन चालकांव्यतिरिक्त रस्त्याने चालणारे पादचारी तसेच हातगाडीवाले व अन्य विक्रेते देखील कुठूनही रस्ता क्रॉस करत होते. त्यांची देखील अडचण इतरांना होत होती. एकंदरीत काय रस्त्यावरची बेशिस्ती याची देही याची डोळा मला पाहायला मिळत होती.
मी सिग्नलला थांबलेला बघून मागील गाड्या देखील थांबत होत्या. पण इतर रस्त्यावरील वाहने बघून काही सेकंदातच त्या देखील पुढे जात होत्या. म्हणजे काय तर मेंढ्यांचा कारभार त्या दिवशी मला रस्त्यावर दिसून आला. माझी रस्त्यावर थांबलेली गाडी बघून कडेला टपरीवजा फुलाचे दुकान चालवणारा एक फुलवाला माझ्याकडे बघत असलेला मला दिसला. कदाचित त्याला त्याच्या फुलांचा हार मला विकावयाचा असावा. तीन-चार वेळा त्यांनी माझ्याकडे बघितले व तो माझ्या दिशेने चालू लागला. आता हा मनुष्य त्याच्या दुकानातील फुलांची हार मला विकत घ्यायला लावणार की काय? या प्रश्नाने माझ्या मनात घर केले. तो हळूहळू माझ्याच गाडीच्या दिशेने चालत येत होता. अन्य बेशिस्त वाहनचालकांप्रमाणे तो देखील मला याच प्रवर्गातील आहे की काय, असे वाटून गेले. तो जवळ आला तरी मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. माझे लक्ष समोर असताना देखील त्याने मला बोलावले व म्हणाला,
"साहेब गाडी जाऊ द्या पुढे. हा सिग्नल सकाळपासून लालच आहे! तो सुटणार नाही!"
त्याच्या या एका वाक्याने माझे सर्व विचारचक्र १८० कोनामध्ये बदलून गेले आणि मनोमन मलाच माझा 'पोपट' झाल्याचे जाणवले! मग काय... पहिला गिअर टाकला आणि मी देखील महानगरपालिकेला दोन शिव्या देऊन त्या बेशिस्त रहदारीचा हिस्सा होऊन गेलो!
बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२
गॅस चेंबर - रत्नाकर मतकरी
गुढकथा व रहस्यकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचा वेगळ्या धाटणीतला हा एक कथासंग्रह आहे. भयकथा या कथा प्रकाराला सामाजिक भयाच्या माध्यमातून प्रदर्शित करणाऱ्या कथा या कथासंग्रहामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मतकरींनी तो अगदीच अलीकडच्या काळामध्ये लिहिलेला आहे. याच कारणास्तव आजच्या समाजरचनेमध्ये असलेल्या गुंतागुंती आणि भयाच्या भावना यातील कथांमधून प्रतीत होतात. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या घटना प्रत्येक कथेतील नायक हेरत असतो. आणि आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पण तो त्यात यशस्वी होत नाही. त्याला खलनायक पुढील कोणतीही कृती करण्याच्या आधी संपवून टाकतात. अर्थात खरा रहस्यभेद होतच नाही. यातून तयार होते ती सामाजिक भयाची भावना. मतकरींच्या या कथासंग्रहातील कोणताच नायक 'जाऊ दे, आपल्याला काय करायचं?' असा प्रश्न विचारत नाही. तो अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला यश प्राप्ती होत नाही. म्हणजेच एका अर्थाने आजच्या कालखंडातील एकंदरीत भयाची परिस्थिती मतकरींनी या कथासंग्रहातील विविध कथांमधून मांडलेली आहे. विशेष म्हणजे गणेश मतकरी यांनी अतिशय सुंदर व सुटसुटीत प्रस्तावना लिहिली असल्याने कथासंग्रहाचा एकंदरीत साचा आपल्याला समजून येतो.
शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२
एका मेलेल्या भाषेची गोष्ट!
(इसवी सन २१४८ मधली ही गोष्ट आहे. आज ही गोष्ट मी मराठीमध्ये लिहीत असलो तरी यात असलेले संवाद भविष्यकालीन इंग्रजी भाषेतील आहेत. ते आजच्या वाचकांना समजावेत म्हणून मराठीमध्ये भाषांतरित केलेले आहेत!)
गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२
दि व्हॉल्ट ऑफ विष्णू
आज कित्येक वर्षानंतर ३०० पानी कादंबरी सलग वाचून संपवली! अश्विन सांघी यांनी लिहिलेली 'दि व्हॉल्ट ऑफ विष्णू' ही कादंबरी म्हणजे एक प्राचीन आणि सद्य परिस्थितीशी मेळ घालणारी थरारक रहस्य कादंबरी आहे.
दीड हजार वर्षांपूर्वी चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने भारताला भेट दिली होती. त्याच्या प्रवासाचे चित्रण व त्याला अनुसरणाऱ्या सद्यपरिस्थितीचे कथानक असा मेळ घालणारी ही कादंबरी आहे. भारत आणि चीन या २१ व्या शतकामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. शिवाय दोघेही सख्खे शेजारी असल्यामुळे स्पर्धा देखील प्रत्येक पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. चार वर्षांपूर्वी चीनने भारताच्या डोकलाम येथे भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावर बराच गदारोळ देखील उठला. याच पार्श्वभूमीचा वापर करून लेखकाने भारत आणि चीन प्राचीन संबंधांपासून आज असलेल्या संबंधांपर्यंतचा लेखाजोखा या रहस्य कादंबरीमधून मांडलेला आहे. ह्यूएन त्संगचा प्रवास आणि आजच्या भारत व चीन मधील घडामोडी हे दोन्ही प्रसंग समांतर पद्धतीने या पुस्तकात रेखाटण्यात आलेले आहेत.
ह्यूएन त्संगचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी, अवघड आणि विविध साहसं व नशिबाने भरलेला जाणवतो. आपल्या लेखणीने लेखक आपल्याला दीड हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातो. विशेष म्हणजे या प्रवास वर्णनात वापरलेली स्थळांची सर्व नावे तत्कालीन आहेत. यातूनच प्राचीन भारतातील बौद्ध संस्कृतीची घट्ट पकड देखील आपल्याला ध्यानात येते. तत्कालीन बौद्धमय भारत कसा होता, हे देखील अनुभवयास मिळते. सुरुवातीलाच या चिनी प्रवाशाच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग स्थळांसहित नकाशामध्ये दाखविण्यात आलेला आहे. कदाचित तो नकाशा नसता तर कादंबरीतील वर्णन सुरस वाटले नसते.
काही वर्षांपूर्वी तमिळ भाषेमध्ये अभिनेत 'एल्लम अरीवू' (हिंदी भाषांतरित-चेन्नई टु चायना) हा चित्रपट बनविला होता. बोधिधर्म या बौद्ध भिक्खूच्या चीन प्रवासावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. याच बोधिधर्मचा प्रवास व कर्तुत्व देखील कादंबरीमध्ये वाचायला मिळते. यात अनेक पात्रे आहेत, शेकडो घटना आहेत. परंतु त्यांचा मेळ अतिशय उत्तमरीत्या लेखकाने बसविल्याचा दिसतो. अतिशय शांतपणे व एकाग्र चित्ताने ती वाचल्यास त्याचे थरारकनाट्य व रहस्यभेद हे वाचनाची खरीखुरी अनुभूती देतात. तीन-चार ठिकाणी झालेले रहस्यभेद हे अनपेक्षित वाटून जातात, यातच लेखकाचे यश सामावलेले आहे!
बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२
काबुल कंदाहरच्या कथा - प्रतिभा रानडे
सातत्याने अस्थिरतेच्या छायेत राहणारा देश म्हणजे अफगाणिस्तान होय. फार वर्षांपूर्वी हा देश असा नव्हताच. सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा अफगाणिस्तान आणि आत्ताचा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मागील काही वर्षांपासून तो दहशतवाद आणि तालिबान या दोन नावांमुळे अधिक ओळखला जातो. याच कारणास्तव अन्य जगाला येथील माणसांबद्दल तसेच राहणीमानाबद्दल विशेष कुतूहल वाटत आलेलं आहे. याच कुतूहलापोटी प्रतिभा रानडे यांनी लिहिलेले 'काबुल कंदाहरच्या कथा' हे पुस्तक वाचायला घेतलं.
लेखिका स्वतः अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षे राहिलेल्या आहेत. त्यांनी या देशामध्ये अनुभवलेले समाजजीवन विविध छोट्या छोट्या कथांमधून या पुस्तकांमध्ये चितारल्याचे दिसते. ज्याद्वारे अफगाणिस्तान मधील तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला पाहता येते. काही कथा या काल्पनिक देखील आहेत. परंतु अफगाणी संस्कृतीच्या माहिती सांगणाऱ्या आहेत. त्या वाचत असताना आपण अफगाणिस्तानमध्ये अप्रत्यक्षपणे वावरत राहतो. भारतातील सोमनाथ मंदिराची १७ वेळा लूट करणाऱ्या मोहम्मद घोरी यावर देखील एक सुंदर कथा या पुस्तकांमध्ये वाचता येते. शिवाय मोहम्मद घोरीच्या लूट प्रसंगावर कादंबरी लिहिण्यासाठी लेखिकेने बरेच संशोधन देखील केले होते. परंतु सदर कादंबरी पूर्णत्वास गेली नाही. एकंदरीत कादंबरीची संकल्पना मात्र उत्तम वाटली. अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असणाऱ्या अफगाणी जीवन शैलीची ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय असेच आहे.
- बाबुराव रामजी
रातराणीचे रहस्य
महाराष्ट्रातील रहस्यकथाकारांच्या परंपरेत गुरुनाथ नाईक हे एक अग्रणी आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे. ७०, ८० आणि ९० च्या दशकात त्यांनी रहस्यकथा वा...
-
तेहरानच्या जमिनीखाली साठ फूट खोल. एक अभेद्य, गुदमरवून टाकणारा आणि जगाच्या नजरेपासून पूर्णपणे लपलेला बंकर. बंकरच्या थंड, निर्जीव आणि ओलसर भिं...
-
भाग १ -> https://baburavramji.blogspot.com/2026/03/nemesis1.html भाग २ -> https://baburavramji.blogspot.com/2026/03/nemesis2.html वेळ:...
-
वेळ: पहाटे ३:५३. ठिकाण: सीन नदी, पॅरिस. पॅरिसवर धुक्याची एक ओलसर, जड चादर पसरली होती. चंद्राचा प्रकाश त्या धुक्याला भेदून खाली येऊ शकत नव्ह...





