शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

अशाच एका सिग्नलवर

सकाळचे ११ वाजून गेले होते. रावेतहून आकुर्डीकडे आपल्या कारने तसा निवांतच चाललो होतो. रस्त्यावरची रहदारी नेहमीसारखी दिसून येत होती. या रहदारीमध्ये दिसणारी वाहन चालकांची गडबड आणि वेंधळेपणा हा नेहमीचाच. पण मी त्याचा भाग नव्हतो, याचे काहीसे समाधान मला वाटत होते. 

एका मुख्य रस्त्यावर लाल सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवली. सिग्नल चालू असून देखील रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहन चालकांची ये-जा सुरूच होती. संध्याकाळी जशी असते तशी रहदारी नसली तरी बऱ्यापैकी वाहने रस्त्यावर फिरत होती. परंतु त्यातील कोणीही सिग्नल पाळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. मी मात्र झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असणाऱ्या रेषेला खेटून माझी गाडी उभी केली होती. इतर तीनही बाजूंनी गाड्या सिग्नलकडे न पाहता आपापल्या रस्त्याने पुढे चालत होत्या. आजवर काहीही झाले तरी मी सिग्नल तोडला नव्हता. एका आदर्श नागरिकाप्रमाणे सिग्नलवर मी एकटा जरी असलो तरी तो पाळत असेच. आणि त्याचा मला अभिमान देखील होता. सिग्नल न पाळणारे किती मूर्ख, याचा अंदाज मी इतर वाहनचालकांकडे बघून घेत होतो. दोन वाहने त्या चौकामध्ये एकाच वेळी समोरासमोर यायची. दोनही वाहन चालकांची नजरा नजर व्हायची. कदाचित मनातल्या मनात शिव्या देखील दिल्या जात होत्या. मग एक जण माघार घेऊन निघून जायचा. त्यानंतर दुसरा देखील त्याचा रस्ता सोडत नव्हता. एकंदरीत गाढवांचा गोंधळ त्या चौकामध्ये दिसून आला. 

आपल्या देशातील लोक किती बेशिस्त आहेत याची प्रचिती त्या सिग्नलवर मला येत होती. याच गोष्टीमुळे आपली लोकं मागे राहतात. आपण फक्त बाहेरच्या देशातील लोकांना चांगले म्हणतो, त्यांची स्तुती करतो. परंतु त्यांचे चांगले गुण आत्मसात करत नाही. हा आपल्या देशातील लोकांचा दुर्गुण आहे, असे म्हणावे लागेल. माझ्या या विचारचक्रामध्ये सिग्नल वरील इकडून तिकडे बेशिस्तपणे फिरणाऱ्या वाहनचालकांच्या हॉर्नचा कर्कश्य आवाज देखील मिसळला जात होता. ते आवाज हा भयंकर रहदारीचा रस्ता आहे, याची आठवण करून देत होते. मी मात्र त्या मूर्ख वाहन चालकांच्या हालचालींकडे शहाणपणाने पाहत होतो. वाहन चालकांव्यतिरिक्त रस्त्याने चालणारे पादचारी तसेच हातगाडीवाले व अन्य विक्रेते देखील कुठूनही रस्ता क्रॉस करत होते. त्यांची देखील अडचण इतरांना होत होती. एकंदरीत काय रस्त्यावरची बेशिस्ती याची देही याची डोळा मला पाहायला मिळत होती. 

मी सिग्नलला थांबलेला बघून मागील गाड्या देखील थांबत होत्या. पण इतर रस्त्यावरील वाहने बघून काही सेकंदातच त्या देखील पुढे जात होत्या. म्हणजे काय तर मेंढ्यांचा कारभार त्या दिवशी मला रस्त्यावर दिसून आला. माझी रस्त्यावर थांबलेली गाडी बघून कडेला टपरीवजा फुलाचे दुकान चालवणारा एक फुलवाला माझ्याकडे बघत असलेला मला दिसला. कदाचित त्याला त्याच्या फुलांचा हार मला विकावयाचा असावा. तीन-चार वेळा त्यांनी माझ्याकडे बघितले व तो माझ्या दिशेने चालू लागला. आता हा मनुष्य त्याच्या दुकानातील फुलांची हार मला विकत घ्यायला लावणार की काय? या प्रश्नाने माझ्या मनात घर केले. तो हळूहळू माझ्याच गाडीच्या दिशेने चालत येत होता. अन्य बेशिस्त वाहनचालकांप्रमाणे तो देखील मला याच प्रवर्गातील आहे की काय, असे वाटून गेले. तो जवळ आला तरी मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. माझे लक्ष समोर असताना देखील त्याने मला बोलावले व म्हणाला, 

"साहेब गाडी जाऊ द्या पुढे. हा सिग्नल सकाळपासून लालच आहे! तो सुटणार नाही!" 

त्याच्या या एका वाक्याने माझे सर्व विचारचक्र १८० कोनामध्ये बदलून गेले आणि मनोमन मलाच माझा 'पोपट' झाल्याचे जाणवले! मग काय... पहिला गिअर टाकला आणि मी देखील महानगरपालिकेला दोन शिव्या देऊन त्या बेशिस्त रहदारीचा हिस्सा होऊन गेलो! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्य...