शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

मुळे गुरुजी स्कूल

यंदाच्या दिवाळीत गावी गेल्यानंतरही बराच निवांत होतो. दिवाळी संपवून एक आठवडा झाला. पण मी माझी सुट्टी वाढवून घेतली होती. अशाच एका सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे राऊत काकांसोबत मॉर्निंग वॉकला हमरस्त्याने निघालो होतो. थोड्याच वेळामध्ये आमच्या शेजारून एक पिवळ्या रंगाची स्कूलबस वेगाने धुरळा उडवत गेली. मी सहजच त्यावरील नाव बघितले, 'मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल'.

मुळे गुरुजी नाव ऐकल्यावर थोडासा चमकलोच. या नावाची शाळा आपल्या परिसरामध्ये आहे, हे पहिल्यांदाच पाहण्यात आलं. त्यामुळे राऊत काकांना मी उत्सुकतेने विचारले,
"काका, ही मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल कुठे आहे?"
"आपल्या शेजारच्याच गावात.", ते उत्तरले.
"म्हणजे मुळे गुरुजींच्याच गावामध्ये?"
"हो, त्यांच्याच मुलाने त्याच्या काही इतर सहकाऱ्यांच्या मदतीने चालू केली आहे. तीन-चार वर्षे झाली या गोष्टीला."
मला काहीसे आश्चर्य वाटले. मुळे गुरुजींचा मुलगा अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखा होता. माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी वयाने मोठा असावा. गुरुजींच्या बुद्धिमत्तेची झलक त्यांच्या मुलाच्या वागण्यामध्ये बिलकुल दिसत नसे. त्याने ही इंग्रजी इंटरनॅशनल शाळा काढल्याचे त्यामुळेच मला आश्चर्य वाटले. मी भूतकाळात हरवलो.
मुळे गुरुजी म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावांमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक आणि प्रचारक. आज माझं माझ्या भाषेवर जे प्रभुत्व आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. केवळ मीच नाही तर आमच्या बरोबरच्या अनेक पिढ्या मुळे गुरुजींनी घडविल्या. परिसरातील विद्यार्थ्यांचे भाषाशुद्धी करण्याचं सर्वात मोठे श्रेय त्यांनाच. ते मराठी भाषेचे विद्यावाचस्पतीच होते जणू! आमच्या सर्वांच्या तोंडून 'मपलं-तुपलं' ची भाषा काढून काढून 'माझं-तुझं' त्यांनी रूळवलं. भाषेचे अलंकार आम्हाला शिकवले. कोणता शब्द कुठे कसा वापरायचा? हे त्यांच्यामुळेच आम्हाला समजलं. आज कुणाशी बोलताना वाक्प्रचार आणि म्हणीचा वापर आम्ही करतो तोही मुळे गुरुजींच्या शिक्षणाचीच देणगी आहे. आमची आजी देखील कोणाला पत्र पाठवायचं असल्यास मी ते पत्र लिहिल्यानंतर सर्वप्रथम मुळे गुरुजींना दाखवून आणायला लावायची. केवळ तीचाच नाही तर गावातील जवळपास सर्वच कुटुंबांचा मुळे गुरुजींवर व त्यांच्या भाषेवर अतिशय दृढ विश्वास होता. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती. एखादी नवी भाषा शिकायची असल्यास आधी आपल्याला आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व असायला हवे, हा विचार त्यांच्यामुळेच माझ्यामध्ये रुजला. आजही माझे इंग्रजीवर जे प्रभुत्व आहे ते केवळ याच मातृभाषेतील शिक्षणामुळे. आजही अनेकदा बालपणाच्या गप्पा होतात तेव्हा मुळे गुरुजींचा विषय निघत नाही, असं कधीच होत नाही. एक आदर्श भाषा शिक्षक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मुळे गुरुजी ओळखले जात असत.
पण आज पाहिलेल्या त्या पिवळ्या बसवरील 'मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल' या नावाने मला अतिशय वाईट वाटून गेले. मराठी भाषेच्या वाचस्पतीच्या मुलानेच एखादी भरपूर पैसे कमावणारी इंग्रजी शाळा काढावी व शिक्षणाचा व्यवसाय करावा, हीच गोष्ट मला रुचली नाही. त्यादिवशी दिवसभर मी हाच विचार करत होतो.
व्यक्तींचे विचार चांगले असतात. परंतु विचारांचा वारसा जपला पाहिजे आणि हा वारसा पुढच्या पिढींपर्यंत नेला पाहिजे. विचार जपणारेच खरे वारसदार होय बाकी रक्ताची नाती फक्त नावाचा वापर करतात. हा धडा त्यादिवशी कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये कोरला गेला. अजूनही असं वाटतंय की, मुळे गुरुजींच्या नावाने मराठीसाठी काहीतरी भरीव व्यासपीठ तयार करून द्यावं!



रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

मॉन्टेसरी स्कुलमधील एक दिवस!

आमच्या एका सख्या मित्राची मुलगी जवळच्या मॉन्टेसरी स्कूलमध्ये छोटा शिशु अर्थात "ज्युनिअर केजी"मध्ये शिकते. तो तिला रोज दुपारी साडेबारा वाजता नियमितपणे आणायला येत असतो. अर्थात वर्क फ्रॉम होम असल्यामुळेच! एक दिवशी त्याला यायला जमणार नव्हतं. म्हणून त्याने मला फोन करून तिला शाळेतून घरी न्यायला सांगितलं. ही शाळा माझ्या घरापासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर आहे. त्यामुळे मी लगेचच तयार झालो. 

दुपारी बरोबर बारा वाजून २५ मिनिटांनी मी शाळेच्या प्रवेशद्वारावर हजर होतो. माझ्यासारखे अन्य बरेच जण आपल्या मुलांना घेण्यासाठी त्या प्रवेशद्वाराभोवती गर्दी करून उभे होते. मी देखील त्याच गर्दीमध्ये सामील झालो. पाच मिनिटांनी शाळा सुटणार होती. आतमध्ये मुलांची चुळबूळ चालू असल्याचे जाणवले. पलीकडेच एका कोपऱ्यामध्ये एका पालकांचे शिक्षकांशी तावातावाने संभाषण चालू असल्याचे मला दिसले. आपल्या पाल्याच्या अर्थात मुलाच्या प्रगतीवरून सदर पालक शिक्षकांना झापत होता. 

"हे बघा मॅडम माझ्या मुलीला बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकवलेल्या नाहीयेत.", असं सांगताना त्या पालकांचा सूर अतिशय रागावलेला दिसत होता. 

"पण काही गोष्टी तुम्ही देखील घरी घ्यायला हव्यात, असे आम्हाला वाटतं.", शिक्षकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. 

"मग तुम्हाला आम्ही फी कशासाठी देतोय? माझ्या मुलाला सर्व काही यायलाच हवं. जर ते त्यालाही आलं नाही तर उरलेली फी मी देणार नाही!" 

त्यांचं संभाषण ऐकून मला धक्काच बसला. ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलाला सर्व काही आले पाहिजे. त्यासाठी पाहिजे तेवढी फी मी द्यायला तयार आहे. हा दृष्टिकोन वाचून ऐकून मी हादरूनच गेलो! शिवाय जुन्या काळात मी अनुभवलेलं शिक्षक-पालक संभाषण आणि आत्ताचं शिक्षक-पालक संभाषण यामध्ये जमीन-आसमानापेक्षा अधिक फरक जाणवत होता. पालकांच्या आपल्या मुलाकडून आणि शिक्षकाकडून किती भयावह अपेक्षा आहेत, याची प्रचिती त्यादिवशी आली. प्रत्येकाला आपल्या मुलाने स्पर्धेत पहिले आले पाहिजे, असं वाटू लागलय. त्यासाठी पाहिजे तेवढे पैसे मोजायला आम्ही तयार आहोत, ही त्यांची भावना झाली आहे. अशा अभूतपूर्व पेचप्रसंगातून आपण पुढच्या पिढ्या कशा घडवणार आहोत? हा अतिशय मोठा प्रश्न आहे.



शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

नेहमीच कुत्रं

सकाळी सातच्या सुमारास म्हणजे जेव्हा गाड्यांविना रस्ते रिकामे असतात त्या काळात रस्त्यांवर रिकामटेकड्या कुत्र्यांचं साम्राज्य असतं. एखादी चार चाकी गाडी दिसली की त्याच्यामागे काही मीटर अंतरापर्यंत भुंकत जायचं आणि जणू काही मीच गाडी पळवून लावली आहे, या अविर्भावात परत मागे फिरायचं. असा रस्त्यावरील अनेक कुत्र्यांचा उद्योग असतो!

माझ्या ऑफिसची वेळ बदलल्यामुळे सकाळी सात वाजताच मला घरून निघावे लागत असे. त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक लागत नव्हती. पण गाडीच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांचा त्रास मात्र व्हायला सुरुवात झाली. इमारतीतून बाहेर पडलं की, हमरस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचं कुत्रं नेहमी माझ्या कारच्या मागे लागायचं. मी त्याचं काय घोडं मारलं होतं? हे त्यालाच ठाऊक. गाडी मुख्य रस्त्याला लागली की अगदी शंभर मीटर अंतरावर हे कुत्रं रस्त्याच्या डाव्या बाजूला एका फूटपाथवर बसून असायचं. त्याला गाडीचा आवाज आला की कान टवकारायचं आणि गाडी जवळ आली की जोरजोराने भुंकत गाडीबरोबर पळत राहायचं. हा त्याचा नेहमीचा उद्योग बनला होता. कदाचित त्याला ही गाडी कोण चालवतं, त्या मनुष्याचा अर्थात माझा चेहरा देखील माहित नसावा! पण नित्यनेमाने त्याचा भुंकण्याचा व गाडीमागे पळण्याचा उद्योग मी अनुभवू लागलो. सुरुवातीला दोन दिवस थोडसं घाबरायला झालं होतं. हे कुत्रं माझ्या गाडीच्या खाली तर येणार नाही ना? याची भीती वाटत होती. परंतु नंतर मला पण त्याची सवय व्हायला लागली. संध्याकाळी ऑफिस वरून परतताना मात्र त्याचं दर्शन व्हायचं नाही. त्यावेळेस रस्त्यावर रहदारी देखील खूप मोठ्या प्रमाणात असायची. त्यामुळे कदाचित ते कुठेतरी दुसरीकडे हुंदडायला किंवा आराम करायला जात असावं. सकाळच्या प्रहरी मात्र त्याचा भुंकण्याचा शिरस्ता काही बंद व्हायचा नाव घेत नव्हता.
एक दिवस मला सकाळी ते कुत्रं दिसलच नाही अर्थात ते नेहमीच्या ठिकाणी नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या पलीकडून उजव्या बाजूला असणाऱ्या बिल्डिंगच्या परिसरातील कुत्रीबरोबर त्याची मौजमस्ती चाललेली मला दिसली! त्यामुळेच आज मला आणि माझ्या गाडीला त्याचे दर्शन झाले नाही. दुसऱ्या दिवसापासून ते नियमितपणे सकाळी गाडीच्या मागे पडण्याचे काम बजावू लागले. एक दिवस तर त्याने आणखी तीन-चार कुत्री गोळा केली होती. विशेष म्हणजे त्या दिवशी ते तिघे चौघे जण देखील भुंकत भुंकत माझ्या गाडीच्या मागे पळायला लागले! माझी गाडी अनेक दिवसांपासून कुत्र्यांसाठी उत्सव मूर्ती झाली होती. नेहमीचीच गाडी असली तरी ते कुत्रं भुंकण्याचं काही सोडत नव्हतं. यामागे त्याचं काय प्रयोजन असावं? हे मला कधीच समजले नाही.

इतक्या दिवसांमध्ये त्याला माझ्या गाडीचा नंबर देखील पाठ झाला असावा, असं मला वाटतं. रविवारच्या दिवशी ते माझ्या गाडीला 'मिस' करत असावं, असं देखील वाटून गेलं! एक दिवस थोडा वेगळा उजाडला. त्यादिवशी देखील ते कुत्रं मला नेहमीच्या जागेवर दिसले नाही त्याच्याबरोबर असलेली अन्य कुत्री तिथे बागडत होती. पण माझी नजर त्याच नेहमीच्या कुत्र्याला शोधू लागली. थोडं पुढे अंतरावर गेल्यावर उजव्या बाजूच्या बिल्डिंग समोर देखील बघितले. तिथे देखील ते नव्हतं. फुटपाथचा रस्ता संपला आणि पूल सुरू झाला. एका अर्थाने त्या कुत्र्याची हद्द संपली होती. पण थोड्याच अंतरावर मला ते दृश्य दिसले. पलीकडच्या बाजूने फुटपाथला लागून ते कुत्रं निपचित पडून होतं. कदाचित कोणत्यातरी वाहनाने त्याला धडक दिली असावी. त्याने तोंडाचा 'आ' वासलेला होता आणि डोळे उघडे होते. त्या दिवशी माझ्या गाडीने नेहमीचा सकाळचा सोबती गमावला होता.

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

तीन पायांची शर्यत - बाळ फोंडके

विज्ञानकथा या बऱ्याचदा कल्पकतेच्या आधारावर रचल्या गेल्या असल्या तरी त्या विज्ञानाला धरूनच असतात, हे या कथांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. बाळ फोंडके हे त्यांच्या विविध कथासंग्रहातून विज्ञाननिष्ठ लेखक म्हणून परिचयात आहेत. 

या कथासंग्रहामध्ये देखील ते आपला विज्ञाननिष्ठ बाणा सोडत नाहीत. विशेष म्हणजे या पूर्ण कथासंग्रहातील कथा या गर्भाशय आणि मातृत्व या दोनच गोष्टींविषयी भाष्य करताना दिसतात. एक हाडाचा वैज्ञानिक उत्तम साहित्यिक असतो तेव्हा अशा कथा तयार होतात, असे बाळ फोंडके यांच्याबद्दल म्हणता येईल. प्रत्येक कथेचे बीज हे मातृत्व संकल्पनेभोवती तयार झालेला आहे. मातृत्व म्हणजे नव्या जीवाला जन्म देणं. जेव्हा एखादा नवा जीव या विश्वामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस तयार झालेले वैज्ञानिक गुंते व त्यातून निर्माण होणारे भावनिक गुंते या कथांमधून आपल्याला समोर येतात आणि त्यातून विज्ञानाची किमया देखील पक्की लक्षात येते. एकेकाळी जेव्हा विज्ञान प्रगत नव्हतं तेव्हा स्त्रियांना मातृत्वाविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. पण प्रगतीच्या नव्या द्वारांनी अनेक अडचणींवर मात केली. त्यातून आई होण्यासाठी स्त्रीला येणाऱ्या अडथळ्यांवर विज्ञानाने उपाय सुचवले. पण यातून सामाजिक आणि भावनिक समस्या देखील तयार होत गेल्या. हा एकच गाभा असला तरी प्रत्येक कथेचे बीज हे निरनिराळे आहे. किमान स्त्रियांना तरी ते विशेष भावेल, याची आशा वाटते. 



शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

अशाच एका सिग्नलवर

सकाळचे ११ वाजून गेले होते. रावेतहून आकुर्डीकडे आपल्या कारने तसा निवांतच चाललो होतो. रस्त्यावरची रहदारी नेहमीसारखी दिसून येत होती. या रहदारीमध्ये दिसणारी वाहन चालकांची गडबड आणि वेंधळेपणा हा नेहमीचाच. पण मी त्याचा भाग नव्हतो, याचे काहीसे समाधान मला वाटत होते. 

एका मुख्य रस्त्यावर लाल सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवली. सिग्नल चालू असून देखील रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहन चालकांची ये-जा सुरूच होती. संध्याकाळी जशी असते तशी रहदारी नसली तरी बऱ्यापैकी वाहने रस्त्यावर फिरत होती. परंतु त्यातील कोणीही सिग्नल पाळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. मी मात्र झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असणाऱ्या रेषेला खेटून माझी गाडी उभी केली होती. इतर तीनही बाजूंनी गाड्या सिग्नलकडे न पाहता आपापल्या रस्त्याने पुढे चालत होत्या. आजवर काहीही झाले तरी मी सिग्नल तोडला नव्हता. एका आदर्श नागरिकाप्रमाणे सिग्नलवर मी एकटा जरी असलो तरी तो पाळत असेच. आणि त्याचा मला अभिमान देखील होता. सिग्नल न पाळणारे किती मूर्ख, याचा अंदाज मी इतर वाहनचालकांकडे बघून घेत होतो. दोन वाहने त्या चौकामध्ये एकाच वेळी समोरासमोर यायची. दोनही वाहन चालकांची नजरा नजर व्हायची. कदाचित मनातल्या मनात शिव्या देखील दिल्या जात होत्या. मग एक जण माघार घेऊन निघून जायचा. त्यानंतर दुसरा देखील त्याचा रस्ता सोडत नव्हता. एकंदरीत गाढवांचा गोंधळ त्या चौकामध्ये दिसून आला. 

आपल्या देशातील लोक किती बेशिस्त आहेत याची प्रचिती त्या सिग्नलवर मला येत होती. याच गोष्टीमुळे आपली लोकं मागे राहतात. आपण फक्त बाहेरच्या देशातील लोकांना चांगले म्हणतो, त्यांची स्तुती करतो. परंतु त्यांचे चांगले गुण आत्मसात करत नाही. हा आपल्या देशातील लोकांचा दुर्गुण आहे, असे म्हणावे लागेल. माझ्या या विचारचक्रामध्ये सिग्नल वरील इकडून तिकडे बेशिस्तपणे फिरणाऱ्या वाहनचालकांच्या हॉर्नचा कर्कश्य आवाज देखील मिसळला जात होता. ते आवाज हा भयंकर रहदारीचा रस्ता आहे, याची आठवण करून देत होते. मी मात्र त्या मूर्ख वाहन चालकांच्या हालचालींकडे शहाणपणाने पाहत होतो. वाहन चालकांव्यतिरिक्त रस्त्याने चालणारे पादचारी तसेच हातगाडीवाले व अन्य विक्रेते देखील कुठूनही रस्ता क्रॉस करत होते. त्यांची देखील अडचण इतरांना होत होती. एकंदरीत काय रस्त्यावरची बेशिस्ती याची देही याची डोळा मला पाहायला मिळत होती. 

मी सिग्नलला थांबलेला बघून मागील गाड्या देखील थांबत होत्या. पण इतर रस्त्यावरील वाहने बघून काही सेकंदातच त्या देखील पुढे जात होत्या. म्हणजे काय तर मेंढ्यांचा कारभार त्या दिवशी मला रस्त्यावर दिसून आला. माझी रस्त्यावर थांबलेली गाडी बघून कडेला टपरीवजा फुलाचे दुकान चालवणारा एक फुलवाला माझ्याकडे बघत असलेला मला दिसला. कदाचित त्याला त्याच्या फुलांचा हार मला विकावयाचा असावा. तीन-चार वेळा त्यांनी माझ्याकडे बघितले व तो माझ्या दिशेने चालू लागला. आता हा मनुष्य त्याच्या दुकानातील फुलांची हार मला विकत घ्यायला लावणार की काय? या प्रश्नाने माझ्या मनात घर केले. तो हळूहळू माझ्याच गाडीच्या दिशेने चालत येत होता. अन्य बेशिस्त वाहनचालकांप्रमाणे तो देखील मला याच प्रवर्गातील आहे की काय, असे वाटून गेले. तो जवळ आला तरी मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. माझे लक्ष समोर असताना देखील त्याने मला बोलावले व म्हणाला, 

"साहेब गाडी जाऊ द्या पुढे. हा सिग्नल सकाळपासून लालच आहे! तो सुटणार नाही!" 

त्याच्या या एका वाक्याने माझे सर्व विचारचक्र १८० कोनामध्ये बदलून गेले आणि मनोमन मलाच माझा 'पोपट' झाल्याचे जाणवले! मग काय... पहिला गिअर टाकला आणि मी देखील महानगरपालिकेला दोन शिव्या देऊन त्या बेशिस्त रहदारीचा हिस्सा होऊन गेलो! 



बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

गॅस चेंबर - रत्नाकर मतकरी

 गुढकथा व रहस्यकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचा वेगळ्या धाटणीतला हा एक कथासंग्रह आहे. भयकथा या कथा प्रकाराला सामाजिक भयाच्या माध्यमातून प्रदर्शित करणाऱ्या कथा या कथासंग्रहामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मतकरींनी तो अगदीच अलीकडच्या काळामध्ये लिहिलेला आहे. याच कारणास्तव आजच्या समाजरचनेमध्ये असलेल्या गुंतागुंती आणि भयाच्या भावना यातील कथांमधून प्रतीत होतात. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या घटना प्रत्येक कथेतील नायक हेरत असतो. आणि आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पण तो त्यात यशस्वी होत नाही. त्याला खलनायक पुढील कोणतीही कृती करण्याच्या आधी संपवून टाकतात. अर्थात खरा रहस्यभेद होतच नाही. यातून तयार होते ती सामाजिक भयाची भावना. मतकरींच्या या कथासंग्रहातील कोणताच नायक 'जाऊ दे, आपल्याला काय करायचं?' असा प्रश्न विचारत नाही. तो अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला यश प्राप्ती होत नाही. म्हणजेच एका अर्थाने आजच्या कालखंडातील एकंदरीत भयाची परिस्थिती मतकरींनी या कथासंग्रहातील विविध कथांमधून मांडलेली आहे. विशेष म्हणजे गणेश मतकरी यांनी अतिशय सुंदर व सुटसुटीत प्रस्तावना लिहिली असल्याने कथासंग्रहाचा एकंदरीत साचा आपल्याला समजून येतो.



कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्य...