यंदाच्या दिवाळीत गावी गेल्यानंतरही बराच निवांत होतो. दिवाळी संपवून एक आठवडा झाला. पण मी माझी सुट्टी वाढवून घेतली होती. अशाच एका सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे राऊत काकांसोबत मॉर्निंग वॉकला हमरस्त्याने निघालो होतो. थोड्याच वेळामध्ये आमच्या शेजारून एक पिवळ्या रंगाची स्कूलबस वेगाने धुरळा उडवत गेली. मी सहजच त्यावरील नाव बघितले, 'मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल'.
मुळे
गुरुजी नाव ऐकल्यावर थोडासा चमकलोच. या नावाची शाळा आपल्या परिसरामध्ये
आहे, हे पहिल्यांदाच पाहण्यात आलं. त्यामुळे राऊत काकांना मी उत्सुकतेने
विचारले,
"काका, ही मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल कुठे आहे?"
"आपल्या शेजारच्याच गावात.", ते उत्तरले.
"म्हणजे मुळे गुरुजींच्याच गावामध्ये?"
"हो, त्यांच्याच मुलाने त्याच्या काही इतर सहकाऱ्यांच्या मदतीने चालू केली आहे. तीन-चार वर्षे झाली या गोष्टीला."
मला
काहीसे आश्चर्य वाटले. मुळे गुरुजींचा मुलगा अगदी सर्वसामान्य
विद्यार्थ्यांसारखा होता. माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी वयाने मोठा असावा.
गुरुजींच्या बुद्धिमत्तेची झलक त्यांच्या मुलाच्या वागण्यामध्ये बिलकुल
दिसत नसे. त्याने ही इंग्रजी इंटरनॅशनल शाळा काढल्याचे त्यामुळेच मला
आश्चर्य वाटले. मी भूतकाळात हरवलो.
मुळे गुरुजी म्हणजे आमच्या
आजूबाजूच्या गावांमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मराठी भाषेचे गाढे
अभ्यासक आणि प्रचारक. आज माझं माझ्या भाषेवर जे प्रभुत्व आहे ते केवळ
त्यांच्यामुळेच. केवळ मीच नाही तर आमच्या बरोबरच्या अनेक पिढ्या मुळे
गुरुजींनी घडविल्या. परिसरातील विद्यार्थ्यांचे भाषाशुद्धी करण्याचं सर्वात
मोठे श्रेय त्यांनाच. ते मराठी भाषेचे विद्यावाचस्पतीच होते जणू! आमच्या
सर्वांच्या तोंडून 'मपलं-तुपलं' ची भाषा काढून काढून 'माझं-तुझं' त्यांनी
रूळवलं. भाषेचे अलंकार आम्हाला शिकवले. कोणता शब्द कुठे कसा वापरायचा? हे
त्यांच्यामुळेच आम्हाला समजलं. आज कुणाशी बोलताना वाक्प्रचार आणि म्हणीचा
वापर आम्ही करतो तोही मुळे गुरुजींच्या शिक्षणाचीच देणगी आहे. आमची आजी
देखील कोणाला पत्र पाठवायचं असल्यास मी ते पत्र लिहिल्यानंतर सर्वप्रथम
मुळे गुरुजींना दाखवून आणायला लावायची. केवळ तीचाच नाही तर गावातील जवळपास
सर्वच कुटुंबांचा मुळे गुरुजींवर व त्यांच्या भाषेवर अतिशय दृढ विश्वास
होता. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती. एखादी नवी
भाषा शिकायची असल्यास आधी आपल्याला आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व असायला हवे,
हा विचार त्यांच्यामुळेच माझ्यामध्ये रुजला. आजही माझे इंग्रजीवर जे
प्रभुत्व आहे ते केवळ याच मातृभाषेतील शिक्षणामुळे. आजही अनेकदा बालपणाच्या
गप्पा होतात तेव्हा मुळे गुरुजींचा विषय निघत नाही, असं कधीच होत नाही. एक
आदर्श भाषा शिक्षक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मुळे गुरुजी
ओळखले जात असत.
पण आज पाहिलेल्या त्या पिवळ्या बसवरील 'मुळे गुरुजी
इंटरनॅशनल स्कूल' या नावाने मला अतिशय वाईट वाटून गेले. मराठी भाषेच्या
वाचस्पतीच्या मुलानेच एखादी भरपूर पैसे कमावणारी इंग्रजी शाळा काढावी व
शिक्षणाचा व्यवसाय करावा, हीच गोष्ट मला रुचली नाही. त्यादिवशी दिवसभर मी
हाच विचार करत होतो.
व्यक्तींचे विचार चांगले असतात. परंतु विचारांचा
वारसा जपला पाहिजे आणि हा वारसा पुढच्या पिढींपर्यंत नेला पाहिजे. विचार
जपणारेच खरे वारसदार होय बाकी रक्ताची नाती फक्त नावाचा वापर करतात. हा धडा
त्यादिवशी कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये कोरला गेला. अजूनही असं वाटतंय की,
मुळे गुरुजींच्या नावाने मराठीसाठी काहीतरी भरीव व्यासपीठ तयार करून
द्यावं!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा